बाल वारकरी दिंडी सोहळा: जत हायस्कूल जतची अद्वितीय परंपरा

बाल वारकरी दिंडी सोहळा : जत हायस्कूलची एक अद्वितीय परंपरा
संतांनी समतेचा झेंडा संपूर्ण विश्वावर नेला. त्या संतविचारांचे संस्कार विद्यार्थी-विद्यार्थिनींवर व्हावेत, सांस्कृतिक अमूल्य ठेवा त्यांच्या बालमनात रुजावा आणि सर्वांनी एकत्र येऊन हरिनाम भक्तीचा आनंद अनुभवावा, या पवित्र संकल्पनेतून आमच्या शाळेत बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते.
या सोहळ्याची सुरुवात तत्कालीन मुख्याध्यापक श्री. होवाळे सर यांनी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या उपक्रमाला आज एक वेगळे, भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने या दिंडीचे नियोजन शाळेत अत्यंत बारकाईने केले जाते.
सोहळ्याच्या काही दिवस आधीच शिक्षक-शिक्षिका विद्यार्थ्यांना वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंग, पालखी, अभंग, गीते यांची माहिती देतात. दिंडीची चाल, रिंगण, नृत्य यांचा सराव करून घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी या सोहळ्यात मनापासून आणि उत्साहाने सहभागी होतात.
सोहळ्याच्या दिवशी संपूर्ण शाळा वारकरी रंगात न्हाऊन निघते. सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका वारकरी वेशभूषेत सजून येतात. मी स्वतःही वारकरी वेश धारण करून दिंडीच्या आगमनापासून मुख्य स्थळापर्यंत सहभाग घेतो. रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजलेला मार्ग, “ज्ञानबा-तुकाराम”च्या गजरात पुढे सरकणारी दिंडी, टाळ-मृदुंगाच्या निनादात गाजणारे अभंग — हे सर्व दृश्य मनाला भक्तिभावाने भारावून टाकते.
दिंडीच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले विद्यार्थी फुलांचा वर्षाव करून स्वागत करतात. काही विद्यार्थी टाळ्या वाजवत उत्साह वाढवतात. त्या क्षणी जणू पंढरपूरचेच दर्शन शाळेच्या पटांगणात घडते, असा भास होतो. विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी पाहताना शाळाच पंढरी झाली आहे असे वाटते.
दिंडीच्या ठिकाणी पोहोचल्यावर गोल रिंगण घेऊन अभंगांच्या तालावर नृत्य केले जाते. पालखीसमोर सर्व वारकरी एकत्र येऊन भक्तिभावाने रिंगण करतात. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पूजा होते आणि खऱ्या अर्थाने सोहळ्याची सुरुवात होते.
यानंतर गटागटाने विद्यार्थी दिंडीतील विविध खेळ, नृत्यप्रकार सादर करतात. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या गजराने वातावरण भारावून जाते. शिक्षक-शिक्षिका देखील फुगडी, झिम्मा आणि वारकरी नृत्य सादर करून या आनंदात सहभागी होतात. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव जणू स्वर्गीय आनंद देणारा ठरतो.
या दिवशी संपूर्ण शाळा पंढरपूरच्या वाळवंटात रूपांतरित झाल्यासारखी वाटते. टाळ्या, गजर, अभंग आणि नृत्य यामध्ये प्रत्येक जण हरखून जातो. या दिंडी सोहळ्याला केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यातून समता, बंधुता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकता आणि आरोग्यदायी जीवनमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर होतात.
सन २०२६ मधील हा सोहळा माझ्या सेवाकालातील शेवटचा ठरला. या दिंडीत सक्रिय सहभाग घेताना मला विशेष आनंद झाला. लहानपणापासून भजन, कीर्तन आणि दिंडी परंपरेचे संस्कार असल्यामुळे हा सोहळा माझ्या मनाच्या अत्यंत जवळचा आहे.
पालकही आपल्या मुलांना वारकरी वेशभूषेत सजवून अभिमानाने शाळेत पाठवतात आणि हा सोहळा आवडीने अनुभवतात. जे पालक प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे यूट्यूबवर प्रक्षेपण करतो, ही देखील एक विशेष बाब आहे.
ही सुंदर परंपरा पुढील काळात अधिक बहरत जाईल, याची मला खात्री आहे.
पुन्हा एकदा — “राम कृष्ण हरी!”
पुढल्या वर्षी वारकऱ्यांची दिंडी येणार
- श्री.सुभाष शिंदे, सेवानिवृत्त कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,जत हायस्कूल,जत.

Comments