दैनिक पंतनगरी समूहाचे R B N न्यूज मराठी : ऋतू उत्सव दिपावली विशेषांक-२०२४: अंक -४था : दीपावली अंकात माझा लेख/सहभाग....




                                    R B N न्यूज  मराठी : श्री.सुभाष  शिंदे, जत शहरा प्रतिनिधी

💫🎊💫🎊💫🎊💫🎊💫🎉💫🎉💫🎉💫🎊💫🎊💫🎊💫💐💫💐💫💐💫💐💫💐💫💐
                           श्री .सुभाष शिंदे ,कलाशिक्षक
                           जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स जत.  तालुका -जत जि.सांगली

✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️💫✍️

'जत' हा शब्द मी शाळेत असताना पाठ्यपुस्तक शिकताना, सांगली जिल्ह्यातील एक मोठा तालुका व दुष्काळी छायेमध्ये असतो एवढचं मला माहिती होते.
बघा हो जीवन ! मी जत मध्ये ३५ वर्ष शिक्षक म्हणून सेवा करेल, असं केंव्हाच वाटले नव्हते! आज मी लेखमालिका लिहित आहे. कारण सेवानिवृत्तीच्या दिवस जवळ येत आहे. माझ्या मनातील भावनेला वाट करून देण्यासाठी मी वाट पाहतोय! मला या जत आणि या तालुक्यातील सर्वांनी खूप दिले आहे. आलो तेंव्हा छत नव्हते, पांघरायला पांघरूण नव्हते, मायेचा हात नव्हता! आज रोजी लाखो प्रेमाचे! मायेचे हात! माझ्याजवळ आहेत ! त्यातील एक हात माझ्या मातृत्वाची भावना जपणारा! डॉ. श्रीपाद जोशी या ज्ञानयोगी माझ्या गुरुचा...!
मी जत मध्ये सन १९८८ साली आलो तेंव्हा मी मूक बधिर विद्यालय जतचे मुख्याध्यापक श्री. कदम सरांना विचारले, जत शहरात नवीन, प्रसिद्ध काय आहे .ते मला सांगा. तेंव्हा त्यांनी सर्व काही माहिती सांगितली. आपल्या संस्थेचे आश्रयदाते, जत हायस्कूल, जतचे मुख्याध्यापक मा. डॉ. श्रीपाद जोशी, छान बोलतात, सुंदर अक्षर आणि प्रेमाने बोलणारे हे एक आदर्श शिक्षक आहेत !
तेवढ्यात डॉ. श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले पत्र शाळेत आलं....! श्री. कदम सरांनी मला ते पत्र मला दिले. बघा हे सुंदर अक्षर! ते पत्र घेऊन मी वाचु लागलो ! अक्षरांचे लेणे, वळणदार अक्षर बघून त्यावेळी ह्या ज्ञानयोगीची भेट आजच घेणार असं मनाशी ठरवले आणि श्री. कदम सरांना सांगितले. आज शाळा सुटल्यानंतर जायचे...!
माझ्या मनात डॉ. श्रीपाद जोशी साहेब कसे असतील ह्या भावना जागृत झाला. आमचे मूक बधिर विद्यालय जत हे कुलकर्णी मळ्यामध्ये होते. शाळा सुटल्यावर मी, कदम सर जत हायस्कूल, जत निघालो. मी कदम सरांना विचारतं होतो. शिंदे सर, तुम्ही जरा थांबा, हे बघा....! ते बघा पांढरे वेशभूषा, हातात पुस्तके, दुसऱ्या हातात पट्टी हे शिक्षक कोण असतील ते मला सांगा असे श्री. कदम सर म्हणाले...!
हेच असणार डॉ. श्रीपाद जोशी सर शंभर टक्के.....! कदम सरांनी
मला विचारले, 'तुम्ही कसं ओळखले?' मी म्हणालो, त्यांच्या पट्टीमुळे..! अक्षर लेखन करताना अत्यंत महत्त्वाचे साधन...!
आम्ही सरांच्या दिशेने निघालो, सर, आमच्याकडे आले आणि म्हणाले, 'आणि कदम सर नमस्कार!' कदम साहेबांनी नमस्कार केला, 'आणि हे कोण? तुम्हांला नमस्कार' असे जोशी सर म्हणाले. त्यावर कदम सर म्हणाले, 'सर, ओळख करून देतो. आमच्या विद्यालयांमध्ये कलाशिक्षक म्हणून श्री. सुभाष शिंदे आले आहेत. त्यांना तुमच्या बरोबर बोलायचं आहे. त्यासाठी आम्ही आलोय'.
मग चला की ऑफिसमध्ये जाऊन बसू या! मी ऑफिसला जाऊन बसलो. गप्पाला सुरुवात कशी झाली. वेळ कसा गेला हे कळालं नाही. मला पण या सरांचा नातं आपलं पहिलं असेल अशी भावना झाली... रात्र झाली साहेब म्हणाले, सुभाषराव उद्या शाळा सुटल्यावर या, आपण पुढील चर्चा करू या.... आता आपण निरोप घेऊ. आणि आम्ही निघालो...
परत मी शाळा सुटली की जत हायस्कूल, जत मध्ये येत असे. विविध गोष्टी, अक्षर लेखन, सामाजिक, शैक्षणिक याविषयी डॉ. जोशीसरांशी बोलत असे! सर्व बोलताना मला साने गुरुजींबरोबर बोलतो की काय असं वाटू लागलं... आम्हांला मूक बधिर विद्यालय, जतला पगार केंव्हा मिळेल नक्की सांगता येत नव्हतं. त्यावेळी सर गावी जाताना पाकिटात काही रक्कम आम्हाला देत असत आणि 'काही लागलं तर सांगा' हे शब्द आम्हाला आधार देत असत. दिवाळी सण आला की, आमचा पगार आम्हांला नव्हताच.. कसं तर एसटीला पैसे होते. ते घेऊन मी गावी गेलो आणि घरच्यांना सांगितले. दिवाळीचे पदार्थ थोडेच करा. पगार सुरू झाला की आपण दिवाळी मोठ्या प्रमाणात करू, दिवाळीच्या आधी दोन दिवस श्री. कदम सर बुधगावाला एक पाकीट घेऊन आले. त्यामध्ये काही रक्कम होती. हे पाकीट डॉ. श्रीपाद जोशी साहेबांनी दिवाळी सणासाठी असं सांगून कदम सर त्यांच्या गावी निघून गेले. ते पाकीट म्हणजे दिवाळी सण साजरा करण्याची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी साहेबांनी हा क्षण दिला, जीवनातील ज्ञानयोगी हा असा मी पाहिला !
मा. कै. ऐनापुरे साहेब, डॉ. जोशी साहेब मूकबधिर विद्यालय, जतमध्ये येऊन विद्यार्थ्यांची चौकशी करीत असत. माझा निर्णय गावी बुधगावाला आल्यानंतर आपण परत मूक बधिर विद्यालय, जतला परत जायचं नाही असं मी ठरवलं. सर्वच प्रश्न निर्माण झाले होते. जत मध्ये राहून आपलं जीवन कसं जगायचं हा प्रश्न माझ्यापुढे होता. मी मुंबईला निघालो. तिथे माझे दाजी पी.एस.आय. होते. त्यांच्याकडे गेलो मुंबईमध्ये नोकरी करावी असं मला वाटलं. तिथे पण नोकरी मिळेल असं वाटतंय.. मी मुंबईला मरोळ पोलिस कॅम्पस मध्ये राहत होतो. तेथे श्री. पाटील साहेब होते. त्यांनी मला सांगितले की तुला दैनिक सामना मध्ये नोकरी बघू या...! मी तेथील साहेबांना विचारून दोन दिवसात पाटील साहेबांनी दैनिक सामना कार्यालय, मुंबई येथे जाऊन आले. मुलाखतीला येण्यासाठी भेट घेतली. त्यावेळी मी दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक साहेबांची भेट घेतली. मी त्यांना सर्व माहिती सांगितली आणि पान नंबर चार चे काम त्यांनी मला दिले. एका ट्रे
मध्ये बातम्या, फोटो आणि मला ४५ मिनिटे वेळ दिला आणि म्हणाले हे पेज तयार करून माझ्याकडे ये! मग मी तुझं काम बघतो आणि ते कार्यालयात निघून गेले. मी दैनिक केसरी प्रमाणे ते पेज तयार केले. फोटोसाठी जागा योग्य प्रमाणात निवड केली आणि साहेबांच्या कडे गेलो. साहेब म्हणाले, 'काय रे! पेज तयार केले?' मी म्हणालो, 'साहेब ....झालं!'. चल बघूया! माझं काम बघितल्यानंतर नंतर साहेबांच्या तोडून शब्द आला, वा... वा...! तू आजपासूनच दैनिक सामनामध्ये हजर हो. अशा रीतीने माझी दैनिक सामना, मुंबई मध्ये कामकाज सुरू झाले. माझं मोठे भाग्य ! सभेमध्ये बोलताना, टी. व्ही. मध्ये बघत होतो त्या थोरांच्या सहवासात मला काम करण्याची संधी मिळाली हे भाग्यच माझं !
मला दैनिक सामना मुंबई मध्ये पहिले व शेवटचे पेज तयार करण्याची संधी मिळाली. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा होता, तरी ग्रामीण भागातील होतो. पण प्रत्येक कामात एक वेगळेपण होते. माझ्या स्वभावामुळे सर्वांना माझे काम आवडू लागले. पण दैनिक सामना, मुंबई मध्ये जास्त काळ काम करू शकलो नाही.
वेळ कशी असती बघा... माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्याच्या सेवेसाठी मी परत बुधगावाला आलो. वडिलांना औषधपाणी केले. बराच कालावधी गेला.शोधावी लागणार? सांगली जिल्हा परिषद मध्ये माझ्या मित्राचे मामा जेष्ठ लेखनिक होते. त्यांनी तात्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. म. ल. देसाईसाहेब यांची भेट घेतली. माझा प्रवास ऐकल्यावर साहेब म्हणाले, 'सुभाषराव तुमचं काम मी नक्कीच करणार मला पाच दिवस द्या.....!' त्यामुळे मुंबईला जाण्याच्या निर्णय परत घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पाच शाळेची नावे दिली. तुला कुठे जाण्यासाठी आवडेल असे साहेबांनी विचारले.... पहिल्या पासून शेवटपर्यंत यादी वाचली. मला फक्त तीन क्रमांकाची शाळा आवडली ! त्यापुढे बरोबर चिन्ह केले. साहेबांनी यादी बघत मला विचारले सुभाषराव तुम्ही तीन क्रमांकाची शाळा का निवडली ?
सर, मी जत मध्ये नोकरी केली आहे. यावेळी डॉ. श्रीपाद जोशी साहेबांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा आहे. तुम्ही जर संधी दिली तर.... साहेब म्हणाले, 'माझे पण डॉ. जोशी साहेब आदर्श गुरूवर्य आहेत. असेच मग जतला जावा. तुमचं काम शंभर टक्के होणार!'. मा. श्री. देसाई साहेबांच्या रूपा मध्यें देवच मला भेटला...!
काही दिवसांनी मी जत हायस्कूल, जत येथे मुलाखतीला गेलो आणि सेवेला सुरूवात झाली. पण पगार सुरू होईपर्यंत डॉ.
जोशींनी जबाबदारी घेतली. सेवा करताना काही अडचणी येत होत्या. पण त्यातून मार्ग काढत होतो. विद्यार्थी, विद्यार्थिनी खुष होते. त्यांना कलाशिक्षक मिळाला होता. मी रेखाटन करताना.... उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मला पण आनंद वाटायचा. मी पण नवनवीन प्रयोग करून जिल्हा, राज्यस्तरीय चित्रकला, नाट्य, गायन स्पर्धेत सहभागी होऊन विविध बक्षिसे मिळवली, तेव्हा पालकांना वाटले की कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि कलेचा सुगंध दरवळला आणि जिल्हा, राज्यस्तरीय बक्षिसे माझ्या हातात दिसु लागली. डॉ. श्रीपाद जोशी साहेबांना चित्रकला विषयांचं ज्ञान छान होते ! 'स्वातंत्र्याची ७५ वर्ष' या विषयावर माझी चित्रे, सरांनी स्वातंत्र्यदिनाविषयीचे सुविचार, सुवचने यांचे लेखन केले व हे चित्रप्रदर्शन जतमध्ये केले. हे चित्रप्रदर्शन जत शहरात पहिले होते. जतकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मला आवडला...!

लेखक :-श्री.सुभाष शिंदे,कलाशिक्षक (R B N न्यूज मराठी जत शहर  प्रतिनिधी )
जत  ता.जत  जि.सांगली.)










Comments